Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

सायबर सुरक्षेविषयीची जागृती म्हणजेच खरी संगणक साक्षरता- अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे

 


सायबर सुरक्षेविषयीची जागृती म्हणजेच खरी संगणक साक्षरता- अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे


उस्मानाबाद,दि.06(जिमाका):- समाजातील सर्व घटकांनी सायबर सुरक्षा समजून घ्यायला हवी, मोबाईल व इंटरनेटचे गुलाम न होता त्याचा आवश्यक तेवढाच जागरूकतेने वापर करायला हवा, सायबरविषयी जागृती म्हणजेच खरी संगणक साक्षरता, असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांनी नुकतेच येथे केले.
    वुमन डॉक्टर विंग,उस्मानाबाद आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने डीपीडीसी हॉल,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे सायबर सुरक्षा या विषयाबाबत जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.
     यावेळी वुमन डॉक्टर विंगच्या अध्यक्ष डॉ. मीना जिंतुरकर, सचिव डॉ.कौशाली राजगुरू, कार्यकारी अभियंता अनिल सगर, लीड बँक मॅनेजर निलेश विजयकर, कार्यकारी अभियंता श्री. कांबळे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, उपशिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार, पोलीस उपनिरीक्षक, सायबर सेल क्रांती ढाकणे, महिला तक्रार निवारण केंद्र प्रमुख माया पानसे, डॉ. चंचला बोडके, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सचिन देशमुख, सचिव डॉ. मिलिंद पोळ, डॉ. राजगुरू,डॉ.मुळे,डायटचे प्राचार्य डॉ. इब्राहीम नदाफ, “सायबर सुरक्षा इंटरनेटचा वापर थोडा सबुरीनं..थोडा सावधातेनं..” या पुस्तकाचे संकलक/संशोधक तानाजी खंडागळे, दैनिक संघर्ष समाजवादाचा चे संपादक संतोष हंबीरे, औरंगाबाद विद्यापीठाचे प्रा. वरूण कळसे, सखी वन स्टॉप सेंटर च्या केंद्रप्रमुख वासंती मुळे, माजी महिला व बालविकास अधिकारी अशोक सावंत, वुमन डॉक्टर विंगच्या व इंडियन मेडिकल असोसिएशनचे अन्य पदाधिकारी, अधिव्याख्याता बिरप्पा शिंदे,नारायण मुदगलवाड  आदि उपस्थित होते.
     अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे पुढे म्हणाले की, मी व माझा हँडसेट हेच माझे जग असे समजून आभासी जीवन जगणारे पिढी झपाट्याने वाढत आहे. अशा आभासी जीवनात प्रत्येकाने सावधपणे पाऊल टाकत आयुष्याची यशस्वी वाटचाल करावी. पूर्वी इंटरनेटची सेवा प्रमुख शासकीय कार्यालयापुरतीच मर्यादित होती मात्र 2001 पासून इंटरनेट वापराची गती प्रचंड वेगाने होत असल्याने या माध्यमातून सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही रोखण्यासाठी प्रत्येकाने मोबाईलचा आणि इंटरनेटचा वापर आवश्यक त्या कामासाठीच केला पाहिजे. मोबाईल व इंटरनेटचा वापर करीत असताना आपण सायबर जगतात किती साक्षर झालो यालाही तितकंच महत्त्व आहे.
   यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या पोलीस उपनिरीक्षक क्रांती ढाकणे या म्हणाल्या की, किंमती वस्तूंपेक्षाही मोबाईलला अधिक महत्त्व आल्याने तो जगण्याचा एक अविभाज्य घटक बनला आहे. प्रत्येक क्षेत्रात मोबाईल इंटरनेटवरून अधिक व्यवहार होत असल्याने सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, त्याला आळा घालण्यासाठी मोबाईल वापरताना प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. प्रत्येकानं सोशल मिडीयाचाही जपून वापर करावा,आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी,असेही त्या म्हणाल्या.
   उपस्थितांशी संवाद साधताना महिला तक्रार निवारण केंद्राच्या प्रमुख माया पानसे म्हणाल्या, महिलांचे सबलीकरण कायद्याने झाले परंतु मनाने नाही. त्यामुळे महिलांनी आपलं वर्चस्व निर्माण करून सन्मानाने जीवन जगायला शिकले पाहिजे.
    यावेळी डॉ.सचिन देशमुख, आकाशवाणी निवेदक दौलत निपाणीकर यांनीही सायबर क्राईम मध्ये आपण कसे गुरफटून जातो,आपली कशी फसवणूक होते, हे उदाहरणासहीत आपले अनुभव सांगून स्पष्ट केले.
     यानंतर औरंगाबाद विद्यापीठातील प्रा.वरुण कळसे यांनी मोबाईलच्या सुरक्षित वापराविषयी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाव्दारे उपस्थितांना अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली. याशिवाय सखी वन स्टॉप सेंटर च्या केंद्रप्रमुख वासंती मुळे यांनी सखी वन स्टॉप सेंटरच्या कार्याबाबत उपस्थितांना माहिती दिली.
*“सायबर सुरक्षा इंटरनेटचा वापर थोडा सबुरीनं..थोडा सावधातेनं..” पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन संपन्न*
या कार्यशाळेच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात सायबर सुरक्षेविषयी अनेक महत्वाच्या विषयांची माहिती अत्यंत साध्या सोप्या भाषेत देण्यात आली आहे. या पुस्तकाचे संपादन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले असून संकलन व संशोधन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, उस्मानाबाद  येथील माहिती तंत्रज्ञान विषयाचे विषय सहायक तानाजी खंडागळे यांनी केले आहे.
     या उपक्रमास प्रमुख मार्गदर्शन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, प्राचार्य, महाराष्ट्र राज्य शिक्षण व प्रशिक्षण संस्था,पुणे विकास गरड, माहिती व जनसंपर्क विभाग औरंगाबाद विभागाचे संचालक गणेश रामदासी, लातूर विभागाचे उपसंचालक यशवंत भंडारे, डायटचे प्राचार्य डॉ. इब्राहीम नदाफ,शिक्षणाधिकारी गजानन सुसर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील आयटी विभाग प्रमुख डॉ.प्रभाकर बुधाराम यांनी केले आहे.
      या कार्यशाळेचे उदघाटन सभागृहातील उपस्थित सर्वांचे मोबाईल सायलेंट मोडवर ठेवून करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना करताना डॉ.मीना जिंतूरकर यांनी कार्यशाळेचा उददेश सर्वांसमोर विषद केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी केले तर आभार डॉ. कौशाली राजगुरू यांनी मानले. कार्यशाळेचा समारोप सामूहिक राष्ट्रगीताने व उपस्थित सर्वांचे सायलेंट मोडवरील मोबाईल नॉर्मल मोडवर आणून करण्यात आला.
     या कार्यशाळेस जिल्हयातील विविध भागातील युवक युवती, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, वुमन डॉक्टर विंगच्या महिला डॉक्टरर्स सदस्य, इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी-कर्मचारी, डाएटमधील अधिकारी-कर्मचारी, शिक्षक, नागरिक, पत्रकार यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.


Previous Post Next Post