‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात हिंदु संस्कृतीनुसार आचरण, हीच हिंदु धर्माची महानता
लातूर* - जगभरात थैमान घालणार्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक देश बाधित झाले आहेत. कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. हा संसर्ग होण्यास एकमेकांना भेटतांना ‘शेक-हॅण्ड’ अर्थात हस्तांदोलन करणे, ‘हग’ अर्थात मिठी मारणे, चुंबन घेणे आदी पाश्चात्त्य पद्धतीही कारणीभूत ठरत आहेत, हे लक्षात आल्यावर अनेक पाश्चात्त्य देशांत आता ‘नमस्ते’ म्हणण्याची पद्धत रुढ झाली आहे. ज्या इंग्रजांनी आपल्यावर 150 हून अधिक वर्षे राज्य करत हिंदु संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला, त्याच इंग्लंडचे प्रिंस चार्ल्स आणि पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनिओ कोस्टा यांच्यासह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल, फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्युएल मॅक्रॉन, आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर आदी अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी हिंदु संस्कृतीनुसार ‘नमस्कार’ पद्धतीचा अवलंब आरंभला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी तर ‘कोरोनापासून वाचण्यासाठी भारतीय पद्धतींचा अवलंब करा’, असे आवाहनच केले आहे. यासमवेतच आपले पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनीही जगाने नमस्काराचा अवलंब करावा, असे आवाहन केले आहे. जगभरात हिंदु संस्कृतीनुसार केल्या जाणार्या कृती या हिंदु संस्कृतीची महानता दर्शवतात. हिंदु संस्कृतीनुसार आचरण, ही काळाची आवश्यकता बनली आहे, असे हिंदु जनजागृती समितीने म्हटले आहे.
याशिवाय हिंदूंच्या धर्मग्रंथांतील प्राचीन चरक संहितेत ‘जनपदोध्वंस’ म्हणजेच ‘महामारी’चा केवळ उल्लेखच नाही, तर तिच्यावर उपायही दिले आहेत. महामारी होऊ नये, यासाठी प्रतिदिन करावयाच्या कृतीही दिल्या आहेत. त्या आज संसर्गजन्य रोगांवर तंतोतंत लागू पडतात. ‘अधर्माचरण’ हे सर्व रोगांचे मूळ आहे, असे आयुर्वेद सांगतो. आयुर्वेदीय उपचार अशा अनेक संसर्गजन्य रोगांवर लागू पडतात. कोणाचे उष्टे खाऊ नये, बाहेरून आल्यावर तोंड-हात-पाय स्वच्छ धुवूनच घरात प्रवेश करणे यांसारख्या अनेक कृती आमची संस्कृती आम्हाला सांगते. चीनमध्ये कोरोना पसरण्यामागे ‘विविध प्राण्यांचे अर्धे कच्चे मांस खाणे’ हेही एक कारण समोर आले होते. त्यामुळे मांसाहारापासूनही दूर होणार्यांची संख्या लक्षणीय आहे. हिंदु धर्मात मांसाहार त्याज्य सांगितला आहे आणि शाकाहाराचा आग्रह धरला आहे.
आपल्या घरातही नित्याने केले जाणारे धर्माचरण उदा. धूप दाखवणे, उदबत्ती लावणे, तुपाचा दिवा लावणे, तुळशी वृंदावनाची पूजा करणे, गोमयाने भूमी सारवणे, कापूर आरती करणे, अग्निहोत्र करणे आदी अनेक नित्य कृतींमुळे वातावरणाची शुद्धी होते. अशा वास्तूंमध्ये असे विषाणू येण्याचे किंवा टिकण्याचे प्रमाण हे अत्यल्प असते. हिंदु संस्कृतीतील धर्माचरणाच्या कृती लाभदायी ठरतात, हे आता जगाला लक्षात येऊ लागले आहे; पण दुर्दैवाने काही बुद्धीवादी अजूनही हिंदूंच्या धर्माचरणाला मागासलेपणा म्हणून हिणवतात. हिंदु संस्कृतीत असलेल्या या धर्माचरणाच्या कृती या आता वैज्ञानिकदृष्ट्याही योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. आपल्या पूर्वजांनी जोपासलेल्या हिंदु संस्कृतीतील नमस्कार करणे, दैनंदिन जीवनात आयुर्वेदाचा उपयोग करणे, शाकाहार करणे यांसह विविध धर्माचरणाच्या कृतींचा आजही नित्य अंगिकार केल्यास आपल्याला अवश्य निरोगी आणि आनंदी जीवन जगता येईल, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.