Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

ही तर लखलखती सोनेरी संधि...!

 


ही तर लखलखती सोनेरी संधि...


अफझल खानाचं स्वराज्यावरील आक्रमण हे स्वराज्यावरचं फार मोठं संकट होतं. उणे पुरे दहा - बारा वर्ष तर झाले होते, शिवाजी राजांना स्वराज्य स्थापून. हाताशी असलेले थोडे फार किल्ले. आजच्या भाषेत दोन तीन जिल्ह्यांपुरतं सुध्दा नव्हतं हे राज्य. 


अन ह्या अश्या राज्याला चिरडण्यासाठी क्रूरकर्मा, महाभयंकर अफझल खान तीस – पस्तीस हजारांचं चतुरंग सैन्य घेऊन निघाला होता. स्वराज्याजवळ होते, ते सर्व मिळून अवघे सहा हजार सैनिक. आदिलशाहीचा तर विश्वास होताच, शिवाजीचं राज्य संपणार म्हणून. पण मोंगल, इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, वलंदेज... या सार्‍यांचाही ठाम विश्वास होता की शिवाजी संपणार आणि त्याचं राज्य उध्वस्त होणार. म्हणूनच अनेक मराठा सरदार सुध्दा अफझल खानाला जाऊन मिळाले होते. 


मात्र शिवाजी महाराजांनी अत्यंत शांतपणे, उत्तेजित न होता, धीर धरत, घाबरल्याचं सोंग करत अफझल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी, अर्थात जावळीच्या खोर्‍यात आणलं. तिथे खानाचा हा तीस – पस्तीस हजाराचा सेना सागर तळ ठोकून बसलेला असताना प्रतापगडाच्या आसपास स्वराज्याचं सैन्य होतं, अवघं तीन हजार..!


दिनांक १० नोव्हेंबर, १६५९ च्या दुपारी महाराजांनी अफझल खानाचा कोथळा बाहेर काढून त्याला मारून टाकला. ही इथपर्यंतची कहाणी आपण ऐकतो. पण खरी गंमत पुढेच आहे. 


खानाला मारून महाराज वर प्रतापगडावर आले ते त्यांचे रक्ताळलेले कपडे बदलायला. त्याच रात्री महाराजांनी दक्षिणेकडे कूच केलं. खानाच्या सैन्याचा निःपात करून सरसेनापती नेताजी पालकर धावले पूर्वेला, सरळ विजापूरवर. आणि दोरोजी ह्या सरदाराला शिवाजीनी पाठवलं, कोंकण च्या मोहिमे वर. तीन दिशांनी त्रिशूळ झेपावला शत्रूवर.


सर्वांची ही कल्पना असताना, की शिवाजीचा तर पार फन्ना उडाला असेल, मराठे अचानक छापा घालत. एक एक किल्ला, एक एक ठाणे घेत ते पुढे जात राहिले. खानाला मारल्याच्या बरोबर १८ व्या दिवशी, अर्थात २८ नोव्हेंबर, १६५९ ला महाराजांनी बलाढ्य असा पन्हाळगड जिंकून घेतलेला होता. अन नेताजी पालकर विजापूर च्या दारात, त्यांना धमकावून आणि आदिलशाहीची प्रचंड लूट घेऊन स्वराज्यात परतला होता. 


खानाला मारल्याच्या अवघ्या अठरा दिवसात, शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य दुपटीहून मोठे केले होते, अन समृध्द ही..!
    
एखाद्या संकटाला संधि मानून गरुडझेप घेण्याचं, याहून चांगलं उदाहरण इतिहासात नाही. 
     ____    ____    ____    ____


अशीच एक मोठी संधि भारतासमोर चालून आलेली आहे, चीनी व्हायरसच्या, म्हणजेच कोरोना व्हायरस च्या संकटामुळे !


अनेकांना हे संकट वाटत असेलही. पण ही आहे एक संधि. प्रचंड मोठी संधि. नियतीनं आपल्यासमोर आणून ठेवलेली..!


कोरोंना नंतरचं जग हे पाहिल्यासारखं नक्कीच नसणार. ते खूप बदललेलं असेल. आमूलाग्र. सामाजिक, कौटुंबिक, राजकीय, आर्थिक अश्या अनेक गोष्टी बदलणार आहेत. अनेक राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था कोसळणार आहेत. अनेक राष्ट्र त्यांच्या एकूण धोरणाचाच फेरविचार करणार आहेत. 


ह्या कोरोना च्या आधी चीन हा जागतिक महासत्तेला टक्कर देण्याच्या पावित्र्यात होता. नव्या काळाला अनुसरून आपली वसाहत निर्माण करण्याच्या मागे होता. अफ्रिकन देशात केलेली गुंतवणूक; पाकिस्तान, बंगला देश, श्रीलंका, मालद्वीप सारख्या लहान लहान देशांत उभे केलेले स्वतः चे भले मोठे इन्फ्रास्ट्रक्चर, तिथले प्रकल्प... या सर्वांतून चीन ला जगावर सत्ता गाजवायची होती, हे निश्चित. 


अजूनही चीन चा तोच प्रयत्न असेल. नव्हे, आहे. चीन चे ह्या सर्व प्रकरणात फारसे नुकसान झालेले नाही. अत्यंत अमानुष पध्दतीने त्यांनी कोरोना व्हायरस चा सामना केला आणि जगात हाहाकार माजला असताना आपला देश पूर्वपदावर आणला. चीन चे हे धोरण चालूच राहणार आहे. नुकतेच चीन च्या पीपल्स बँक, ह्या मध्यवर्ती बँकेने भारताच्या HDFC Ltd चे 1.75 कोटी शेअर्स विकत घेतले, जे शेअर होल्डिंग च्या 1.01 टक्के आहेत. चीन असं करतोय. तो करत राहणार. चीन चा अंदाज आहे की ह्या महामारीचा फार मोठा फटका त्याला बसणार नाही. 


पण चीन ला फटका बसणार आहे, तो वेगळ्याच अर्थाने. सार्‍या जगाचं जनमत सध्या चीन च्या विरोधात आहे. 


जपान सरकार ने नुकतीच घोषणा केलीय की जपानच्या सर्व कंपन्या, ज्या चीन मधे उत्पादन करत होत्या, त्या तेथील उत्पादन बंद करून जपान ला आणतील किंवा इतरत्र जातील. थोडक्यात काय, तर चीन नको. आणि हे सर्व करून घ्यायला जपान सरकार ने, जपानी कंपन्यांसाठी 2.2 बिलियन यूएस डॉलर्स ची रक्कम बाजूला काढलीय. म्हणजे, वाटल्यास पैसे घ्या, पण चीन मधून बाहेर पडा. 


संकटाला संधीत बदलण्याचं हे जपानचं चांगलं उदाहरण. मुळात जपान आणि चीन ह्या दोन देशांमध्ये अक्षरशः पिढीजात वैर आहे. त्यामुळे जपानला, आपल्या देशातील कंपन्यांनी चीन ला जायला नको होतं. मात्र चीन मध्ये उत्पादन करणे स्वस्त असल्याने, आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धा करण्यासाठी जपानी कंपन्या चीन मधे गेल्या. जपानी सरकार ला ते पटलं नसलं तरी चालवून घ्यावं लागलं. 


पण आता नाही. जपान सरकार ने कोरोना ची संधि साधली अन आपल्या सर्व कंपन्यांना चीन मधून बाहेर पाडण्याचे आदेश दिले. सोबतीला मदतही दिली. जपान 165 Billion US Dollars चा एक्सपोर्ट चीन ला करतो आणि चीन हून 137 Billion US Dollars च्या मालाची आयात करतो. अर्थात जपान साठी हा सरप्लस व्यापार आहे. 


अगदी पूर्ण नाही, तरी बराच मोठा व्यापार हा जपान आता चीन बरोबर करणार नाही. जपान मधे उद्योग लावणं प्रचंड महाग आहे. समजा साठ – सत्तर टक्के उद्योग जरी जपान ने त्यांच्या देशात परत आणले, तरी उरलेल्यांचं काय..? वियतनाम, कंबोडिया, बंगला देश, श्रीलंका... ह्या देशात हे उद्योग जाऊ शकतात. पण त्यांची क्षमता तर फार कमी आहे / फार लहान आहे. त्यामुळे भारत ही नैसर्गिक निवड होऊ शकेल. अर्थात जपानी उद्योगांना भारतात खेचून आणण्याची कितीतरी मोठी संधि चालून आलीय. त्यातून जपान चे प्रधानमंत्री शिंजो आबे आणि आपले मोदीजी हे चांगले मित्र आहेत. जपान भारताच्या मागे भक्कमपणे उभा असतो. हे सर्व कोरोना व्हायरस प्रकरण होण्याआधीच, जपान ने फूड सेक्टर मधेही भारतात गुंतवणूक करायला सुरुवात केलीय. पुण्याजवळ ‘यीस्ट’ उत्पादनाचा भला मोठा प्लांट उभा राहतोय. आजपर्यंत ऑटोमोबाइल्स, इलेक्ट्रॉनिक्स, स्टेशनरी सारख्या मोजक्या क्षेत्रात भारतात गुंतवणूक करणारा जपान, भारताला आपला सर्वकष मॅन्युफॅक्चरिंग पार्टनर म्हणून बघतोय...!
    ____    ____    ____    ____


गेल्या एक दीड वर्षांपासून अमेरिका आणि चीन मधे ‘ट्रेड वॉर’ चालू होतं. ते थोडं निवळतंय असं वाटतंय, तर हे कोरोना प्रकरण समोर आलं. 


आता तर चित्र पार बदललंय. अमेरिकेत चीन विरोधात प्रचंड जनाक्रोश निर्माण झालाय. आज न्यूयॉर्क सकट अवघ्या अमेरिकेची जी फार मोठी वाताहत झालेली आहे, त्याला चीनी व्हायरस मुळे चीन जबाबदार आहे, अशी तेथील लोकांची ठाम श्रध्दा आहे. त्यामुळे येऊ घातलेल्या निवडणुकीत जिंकण्यासाठी टृंप किंवा डेमोक्रेट पक्षाच्या उमेदवाराला चीन विरोधी भूमिका घ्यावीच लागणार आहे. अमेरिकेची एक प्रतिष्ठित अशी Global Manufacturing Consulting Firm आहे, Kearney ह्या नावाची. त्यांनी परवा 7th Annual Reshoring Index जाहीर केलाय. ह्या रिपोर्ट मधे त्यांनी स्पष्टपणे म्हटलय की अमेरिकन व्यापार्‍यांनी आपल्या अनेक वस्तु उत्पादनासाठी चीन ला दिल्या होत्या. कारण ‘कॉस्ट’ हा मुद्दा होता. आता मात्र ह्या उद्योगांना चिंता सतावतेय ती ‘रिस्क’ ची. 


सध्या अमेरिका, चीन हून 539.5 Billion US Dollars चा माल आयात करतो. यात बरीच कपात होईल हे निश्चित. अमेरिका अगदी 50% माल, चीन हून आयात करणार नाही असं जरी गृहीत धरलं तरी हा आकडा येतोय, 270 Billion US Dollars च्या आसपास चा. आणि त्यामुळेच, Kearney चा रिपोर्ट हे ठामपणे म्हणतोय की अमेरिकन उद्योग आता इतरत्र पर्याय शोधतील. त्यांना पर्याय आहेत – मेक्सिको, भारत, ब्राझील, कंबोडिया वगैरे... 


जी गत अमेरिकेची, तीच यूरोपियन देशांची. गेल्या पंधरा – वीस वर्षांत अनेक यूरोपियन देश, त्यांचं मूलाधार असलेलं मॅन्युफॅक्चरिंगच विसरून गेलेले होते. चीन स्वस्तात बनवून द्यायचा, म्हणून युरोपातले अनेक उद्योग धंदे बंद पडले होते. इटली ची संपूर्ण फॅशन इंडस्ट्री, चीन मधून वस्तु बनवून आणायची आणि आपला लोगो मारून विकायची. पण आता हे होणार नाही. साठ टक्क्यांपेक्षा जास्त उद्योग, चीन ला पर्याय शोधतील. 


ह्या चीनी व्हायरस ने सारंच उलटं पालटं करून टाकलंय, अन ह्या अदलाबदलीत आपल्या समोर उभी केलीय एक लखलखीत सोनेरी संधि. 
    ____    ____    ____    ____


भारता सारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशानं उत्पादन आधारित अर्थव्यवस्था राबवायला हवी होती. मात्र आपल्या देशाने नव्वद च्या दशकामध्ये आर्थिक सुधारणांचा जो धडाका लावला, तो सेवा क्षेत्राच्या दिशेने. त्यामुळे काही उद्योग मोठे झाल्यासारखे वाटले. मात्र मॅन्युफॅक्चरिंग तितकं पुढे गेलं नाही. सेवा क्षेत्रात आपली आर्थिक अवलंबिता (dependency) जास्त आहे, आणि त्याच बरोबर आहे ती मोठी जोखीम (risk). 


आता मात्र ही खूप चांगली संधि समोर आहे. आपण उत्पादन आधारित व्यवस्थेकडे जाऊ शकतो. सुमारे सातशे – आठशे वर्षांपूर्वी जागतिक व्यापारात तीस टक्क्यांपेक्षा जास्त वाटा असलेले आपण, आपल्या उत्पादन कौशल्यामुळेच जगभर आपला माल पाठवत होतो. 


उत्पादनाची प्रचंड आणि वेगवेगळी क्षेत्र आपल्याला खुणावत आहेत. त्या चीनी कंपन्यांनी कशी कल्पनाशक्ति लढवून, लहान लहानश्या वस्तूंपासून, खेळण्यांपासून ते हाय टेक मशीनरी पर्यंत वस्तु बनवून जगभर विकल्या..? सन 1995 मध्ये फरश्या चर्चेत नसलेला चीन, अचानक 2005 मधे आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करू शकतो, तर आपणही ते साध्य करू शकतो.


अगदी घरोघरी चांगल्या चांगल्या हस्तकलेच्या वस्तु बंनविण्यापासून ते विशिष्ट मशीनरी तयार करण्यापर्यंत प्रत्येकाला प्रचंड मोठी संधि अवचितपणे समोर आलेली आहे. या संधीचं सोनं करण्यासाठी प्रचंड मेहनत करणं आवश्यक आहे. अफझल खानाचा खात्मा करून शिवाजी महाराज विश्रांती साठी प्रतापगडावरच थांबले असते, तरी त्यांचं कौतुकच झालं असतं, त्यांनी हे जीवघेणं संकट संपवलं म्हणून. पण ते ‘महाराज’ होते. पुढील 18 दिवस ते आणि त्यांच्या सहकार्‍यांनी, आलेल्या संधीचा फायदा घेत, अहोरात्र लढाया मारून, स्वराज्याचा विस्तार दुप्पट केला. 


खूप परिश्रम, पॅकेजिंग वर भर, नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग, इंटरनेट च्या माध्यमातून जागतिक बाजारपेठेत शिरकाव, अत्यंत व्यवसायीक दृष्टीकोण या सर्वांमुळे जागतिक बाजारपेठेत आपलं स्थान बनविणं आपल्याला शक्य आहे. 


हे सगळं सोपं नाही. कठीण आहे. खूप खूप कठीण आहे. पण अशक्य नाही.


सत्तर च्या दशकाच्या सुरूवातीला सायकल वरुन आणि बैलगाडी वरुन सॅटेलाइट चे सुटे भाग नेतानाचे फोटो आपण बघितले असतील. तेंव्हा जग त्यांच्यावर हसत होतं. उपहास करत होतं. ‘हे काय सॅटेलाइट बनवणार..!’ असं म्हणत होतं.


आणि आज..? 


आपण अवकाश क्षेत्रातली चौथी महाशक्ती आहोत. एका लॉंचर मधून शंभर च्या वर सॅटेलाइट अवकाशात सोडण्याचा विक्रम आपल्या नावावर आहे. मंगळावर पाहिल्याच प्रयत्नात यान पाठवणारे आपण जगातला एकमात्र देश आहोत...!


आपण करू शकतो...


आपल्या परमाणु कार्यक्रमाला जेंव्हा अडचण आली, तेंव्हा ती सोडवायला आपण कोण्या प्रगत देशाकडे नाही गेलो. आपणच सोडवली आपली ती समस्या. आज आपण न्यूक्लिअर पॉवर मध्ये जगात तिसर्‍या स्थानावर आहोत. 


कारण आपण करू शकतो. 


सारं जग अत्यंत आदरानं आपल्याकडे बघतंय. भारतीय जीवन मूल्यांची ओळख जगाला होतेय. ‘हे संकट भारतात फार खोलवर आणि आतवर पोहोचू शकलं नाही, कारण आपली जीवनशैली’ असं जग आता म्हणू लागलंय. अमेरिकेसारखा देश, आपल्या देशात बनवलेल्या औषधांसाठी घायकुतीला येतोय. औषधांवरचे प्रतिबंध दूर करतोय.


नियती संकेत देतेय. खूप चांगल्या गोष्टी घडून येताहेत. केंद्रात संवेदनशील आणि खंबीर सरकार आहे. प्रधानमंत्री मोदींसारखा कणखर नेता आपल्याला मिळालाय. एकशे तीस कोटींचा हा राष्ट्रपुरुष जागा झालाय. समाज सक्रिय आहे. 


ह्या कोरोना च्या संकटाने एक लखलखती सोनेरी संधि आपल्यापुढे आणून ठेवलीय. ही संधि आपण गमावली तर आपल्यासारखे कर्मदरिद्री आपणच असू. मग पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही, हे निश्चित...!                         
-   प्रशांत पोळ


Previous Post Next Post