वीजेचा शॉक लागून तरुण शेतकर्याचा मृत्यु
आ. कराड यांच्याकडून कुटुंबीयांचे सांत्वन
लातूर दि.०६ - शेतात काम करत असताना वीजेचा शॉक लागल्याने भादा सर्कल मधील मौजे समदर्गा येथील लक्ष्मण राजेंद्र सुरवसे या तरुण शेतकर्याचा दुर्दैवी मृत्यु झाला भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी शनिवारी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेवून सांत्वन केले.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील भादा सर्कल मध्ये असलेल्या मौजे समदर्गा येथील चोवीस वर्षीय लक्ष्मण राजेंद्र सुरवसे हे दररोज प्रमाणे गुरुवारी आपल्या शेतात गेले. जनावरांचा चारा कट करीत असताना पावसामूळे जमीन ओलसर असल्यामूळे कडबा कुट्टीच्या मशिनचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यु झाला. या घटनेमूळे संपूर्ण गावकर्यांत हळहळ व्यक्त केली जात असून सदरील घटनेची माहिती मिळताच भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी शनिवारी समदर्गा या त्यांच्या गावी जावून कुटुंबीयांची भेट घेतली व सांत्वन केले. मयत लक्ष्मण सुरवसे यांच्या पश्चात आई-वडिल, बहिणी, पत्नी आणि चार महिन्यांचा एक मुलगा आहे.
यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रम शिंदे, पद्माकर चिंचोलकर, राजकिरण साठे, अशोक सावंत, सतिश कात्रे, देवराव मोहिते, उद्धव काळे, दिगंबर माळी, दयानंद सुरवसे, सुधाकर तिरुके, मच्छिंद्र गोमदे, महादेव ढोक, पंताजी काळे यांच्यासह अनेकजण होते.