गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
किर्ती दालमिल वर धाड..चार बालकामगारांची सुटका
जोखीमच्या ठिकाणी कामावर लावणाऱ्या ठेकेदारा विरुद्ध गुन्हा दाखल.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची कारवाई
लातूर- लहान मुलांना शालेय शिक्षण मिळायला हवे. संस्कार घडविण्याच्या वयातच त्यांना बालमजुरीला जुंपण्याचा प्रकार आजही घडत असून,बालमजुरी प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात विविध मार्गाने जनजागृती करण्यात येते. बालकांना कामावर ठेवू नये. असा कायदा असूनही सर्रास बालकांना बालमजूर म्हणून कामावर ठेवले जाते.बालमजुरी प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी बालमजूर नियमन व निर्मूलन कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी निर्देशित केले होते.
त्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यातील विविध आस्थापनात काम करणाऱ्या बालकामगारांची माहिती घेत असताना पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पोलीस पथकाला मिळालेल्या माहितीवरून अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात पोलीस उपाधीक्षक श्री. सुनील गोसावी यांच्या नेतृत्वातील पथकाने एमआयडीसी, लातूर येथील कीर्ती डाळमिल वर छापा टाकला. तेव्हा तेथे चार अल्पवयीन मुले अतिजोखीमीचे काम करीत असताना मिळून आले. त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, लातूर येथील खाडगाव परिसरात राहणारा अन्वर बरकत शेख याने नमूद अल्पवयीन मुलांना बालकामगार म्हणून डाळ मिल मध्ये कामाला लावले आहे. अशी माहिती दिली.
नमूद ठेकेदारने बाल कामगाराकडून कमी वेतनात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी डाळ मिल मधील धोकादायक मशिनरीच्या ठिकाणी बालकामगार म्हणून नियुक्त करून अतीश्रमाचे काम करून घेऊन मानसिक व शारीरिक शोषण करीत असल्याचे निदर्शनास आले.यावरून ठेकेदार
1) अन्वर बरकत शेख राहणार खाडगाव रोड लातूर
याचे विरुद्ध पोलीस ठाणे एमआयडीसी येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 655/2022 कलम 3(A),14 बालकामगार प्रतिबंध अधिनियम 1986, तसेच 75 व 79 अल्पवयीन न्याय कायदा 2015 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून चारही बाल कामगारांची सुटका करण्यात आलेली आहे.
चोर सोडून सन्यासाला फाशी...
"लहान मुलांना शालेय शिक्षण मिळायला हवे,परंतू पैशाच्या हव्यासापोटी बालमजुरीला जुंपन्याचा प्रकार समोर येत आहेत.विशेष म्हणजे ठेकेदार हा कामगार पुरवण्याचे काम करत असतो,त्यामध्ये लहान मुले असने कायद्याने गुन्हा असताना मात्र मालक आणि ठेकेदार त्याकडे दुर्लक्ष करतात.अशा वेळी मालक आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचे सोडून ठेकेदारावर गुन्हा नोंद करणे म्हणजे चोर सोडून सन्यासाला फाशी...अशी अवस्था झाल्याचे जोरदार चर्चा सध्या लातूर शहरामध्ये होवू लागली आहे"
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस उपाधीक्षक सुनील गोसावी यांचे नेतृत्वात महिला पोलीस उपनिरीक्षक शामल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी, पोलीस अमलदार प्रकाश जाधव, सदानंद योगी, महिला पोलीस अमलदार पंगे, गिरी यांनी केली आहे.