महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हलविणार नसल्याचे केंद्रीयमंत्री गडकरी यांचे आश्वासन
---------------------------------------------------------------------------
लातूरमध्ये डॉ. अरविंद भातांब्रे यांच्या उपस्थितीत लिंगायत समाजाकडून जल्लोष !
लातूर : लातूर शहरातील जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचा अश्वारूढ पुतळा हलवला जाणार नाही, असे आश्वासन केंद्रीय रस्ते-वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नवी दिल्लीत दिले. हा पुतळा हटविण्यात येऊ नये या मागणीसाठी आमरण उपोषणाचा करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अरविंद भातांब्रे यांनी समाजबांधक तसेच विविध पक्ष-संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह पेढे वाटून, फटाके फोडून जल्लोष केला.
लातूर शहरातील कव्हा नाका येथील महात्मा बसवेश्वर चौकातील महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा राष्ट्रीय महामार्गाच्या नावाखाली हटविण्याचा घाट घालण्यात आला होता. समस्त लिंगायत तसेच बहुजन समाजाच्या भावना दुखावणारा हा निर्णय प्रशासनाने तात्काळ मागे घ्यावा यासाठी डॉ.अरविंद भातांब्रे यांच्यासह लक्ष्मण मुकडे, विवेकानंद स्वामी, आनंद जीवने, पालापुरे अप्पा यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. प्रशासनाने या उपोषणाची दखल घेऊन पुतळा हटविण्यात येणार नसल्याचे लेखी पत्र दिले होते. मात्र, त्यानंतर समाजाच्या शिष्टमंडळाने बुधवारी नवी दिल्लीत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यावेळी गडकरी यांनी पुतळा हलविला जाणार नाही, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे. दस्तुरखुद्द रस्ते विकास मंत्र्यांनीच हे आश्वासन दिल्याने या पुतळ्याबाबतचा संभ्रम आता कायमचा दूर झाल्याने सामाजिक कार्यकर्ते डॉ. अरविंद भातांब्रे यांच्यासह सहकाऱ्यांनी केलेलं आमरण उपोषणही फलदायी ठरलं आहे.
याप्रसंगी डॉ. अरविंद भातांब्रे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याप्रती विशेष आभार व्यक्त केले. समाजाच्या मागणीकडे अत्यंत गांभिर्यपूर्वक लक्ष दिल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले. याकामी समस्त लिंगायत तसेच बहुजन समाजाकडून तसेच समाजाच्या विविध घटकांकडून मिळालेल्या सहकार्याबद्दलही डॉ. भातांब्रे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहे. महात्मा बसवेश्वर चौकातील आनंदोत्सव साजरा करत असताना डॉ. अरविंद भातांब्रे यांच्यासह बसवराज धाराशिवे सोनू डगवाले, राजा राचट्टे, स्मिताताई खानापुरे, लताताई मुद्दे, पूजा पंचाक्षरी, बालाजीआप्पा पिंपळे, नितीन मोहनाळे, सचिन हुरदळे, राम स्वामी, बसवंतप्पा भरडे, मन्मथप्पा पंचाक्षरी, शरणाप्पा अंबुलगे, संकेत उटगे , शिवानंद हैबतपूरे , नरेश पेद्दे, सतीश पानगावे , राहुल नारगुंडे , सुनील ताडमाडगे, संतोष कळसे, शंकर खोबरे,बाळासाहेब खोशे,सतीश मिरचे,शरणआप्पा अंबुलगे,अमित पाटील,प्रेम शेटकार, विजय कूडूंबले, संतोष पाटिल, विवेक पाटील, ईश्वर तत्तापूरे, बसवेश्वर हेंगणे , राजकुमार खोबरे, बसवेश्वर हालकुड़े, पीतांबर धूमाळ, सतीश पानगवे, रवि ओटे, बालासाहेब महाजन, ऋषि झुंजे, बळवंते , सुधीर मिरकले,वैभव आड़सुल, प्रा. संगमेश्वर पानगावे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.