गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
सोशल मीडियावर पोस्ट करताना किंवा लाईक, फॉरवर्ड करताना जनसामान्यांचे धार्मिक भावना दुखावणार नाही याची दक्षता घ्या.
सोशल मीडिया वापरताना अतिशय जबाबदारीने वागा. -पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे*
सोशल मीडिया हा आजच्या युगातल्या नागरिकांच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे. ते दुधारी शस्त्र आहे. म्हणजेच त्याचा वापर जितका चांगला ठरू शकतो, तितकाच तो कोणाच्या जिवावरही उठू शकतो. कारण सोशल मीडियामुळे कोणाच्या भावना दुखावू शकतात, कोणाची माथी भडकू शकतात आणि त्यातून दुर्घटनांना, गुन्ह्यांना आमंत्रण दिलं जाऊ शकतं. घटनेने सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं असलं, तरी त्या स्वातंत्र्यामुळे दुसऱ्या कोणाच्या अधिकारांवर गदा येत असेल, तर ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य ठरत नाही. म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करताना काळजीपूर्वक केला पाहिजे. असे आवाहन लातूर जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी केले आहे.
आजच्या युगात सोशल मीडिया हे अभिव्यक्तीचं मोठं माध्यम आहे. त्यामुळे भारतीय कायद्यानुसार, सार्वजनिक माध्यमावर आणि सार्वजनिक ठिकाणी व्यक्त होताना काय काळजी घेतली पाहिजे, हे सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्यास आयटी कायद्याच्या कलम 67 नुसार कारवाई केली जाते. त्यामुळेच भावना दुखावणारी भाषा असलेला मजकूर, फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करू नयेत. धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न करणारा, कोणाचा आत्मसन्मान दुखावणारा, देशाची एकता-सार्वभौमत्व आदींचं नुकसान करणारा, कोणत्या संप्रदायाच्या विरोधातला मजकूर सोशल मीडियावर पोस्ट करू नये. तसेच,अफवा पसरवू नयेत. कोणाला जीवे मारण्याची धमकी देऊ नये. अश्लील कंटेंट, चाइल्ड पोर्नोग्राफी आदी शेअर केल्यासही कारवाई होते. त्यापैकी काही गुन्ह्यांसाठी तुरुंगवासही होऊ शकतो. भारतीय आयटी कायद्यानुसार सायबर क्राइमसाठी 3 वर्षांपासून आजीवन कारावासापर्यंतची शिक्षा होऊ शकते. तसेच एक लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतचा दंडही होऊ शकतो, अशी तरतूद आहे. नियमबाह्य मजकूर सोशल मीडियावर पोस्ट केल्यास माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 नुसार दोषी ठरवलं जाते. त्यात सोशल मीडिया युझर्स, सोशल मीडिया कंटेंट प्रोव्हायडर, नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हायडर्स आदींचाही समावेश असतो.
घटनेच्या कलम 19 (1) (A) नुसार सर्व नागरिकांना आपले विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व जण त्या स्वातंत्र्याचा उपभोगही घेत आहेत; मात्र या स्वातंत्र्यामुळे दुसऱ्या कायद्यांचं उल्लंघन होता कामा नये, असा दंडक आहे. फेसबुक, ट्विटरसह सर्व प्रकारच्या सोशल मीडियावर पोस्ट करताना या नियमांचं भान असणं गरजेचं आहे. कोणाच्या भावना दुखावणारा, दोन समुदायांमध्ये भांडणं लावणारा, माथी भडकावणारा मजकूर कोणत्याही स्वरूपात पोस्ट केला जाऊ नये.
समाजात सोशल मीडिया युझर्सची संख्या मोठी आहे. त्यामुळेच कोणी काही चुकीची पोस्ट केली, तर ती पटकन फार मोठ्या समुदायापर्यंत पोहोचते आणि त्यामुळे मोठे दुष्परिणाम होऊ शकतात. दिवसेंदिवस सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. म्हणूनच त्याचा गैरवापर रोखण्यासाठी कायद्यात कडक तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे.
तसेच लातूर पोलिसाचे "सोशल मीडिया वॉचर सेल" सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवून असून सोशल मीडियावर आक्षेपार्य मजकूर पोस्ट फॉरवर्ड करणारे युजर्सवर कार्यवाही करण्यात येत असून मागील काही महिन्यात अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. सोशल मीडियावर फिल्मी डायलॉग म्हणत हातात शस्त्र घेऊन रील्स, इमेज, व्हिडिओ बनवणाऱ्या जवळपास 185 अल्पवयीन मुलांचा शोध घेऊन त्यांना व त्यांच्या पालकांना समज देण्यात आलेली आहे.